कागद तसेच पुठ्ठ्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचा, फोटोग्राफीचा व चित्रकलेचा छंद…
मानव एक विचारशील प्राणी आहे. मानवाची एक प्रगत सजीव म्हणून उत्क्रांती ही त्याची परिणीती आहे. एकावेळी मानवाच्या मनात अनंत विचार असतात. त्यातील एकेक विचार धागा पकडून त्यावर सखोल विचार करणे. आपल्या माहिती व अनुभवाच्या आधारे त्या विचाराला अनेक प्रश्न विचारून, मिळालेल्या उत्तरावर पुन्हा पुन्हा विचार करून योग्य- अयोग्यतेच्या, हीत-अहिताच्या, परिणामांच्या कसोट्यांवर तो विचार तपासून घेणे. एका निश्चित अंतिम विचारापर्यंत, निर्णयापर्यंत पोहचणे. त्या विचाराचा अंगीकार करणे, अंमल करणे. त्यातही प्रत्येक टप्प्यांवर विचाराने पुढचे पाऊल उचलणे. एकंदरीत जीवन जगण्याच्या प्रक्रियेत विचार मूलस्थानी आहे. माणूस संपतो, मृत पावतो माञ त्याचा विचार जीवंत राहतो. विचारांच्या रूपाने मानव अमरत्व प्राप्त करतो. अर्थात त्या विचारांना कृतींची जोड हवी.
शारिरीक शक्तीसाठी संतुलित आहार तसा मानसिक, बौद्धिक बळासाठी विचार असतो. हा वैचारिक आहार पुरविण्याचे कार्य राजाराम संभाजी पवार आपल्या सातत्यपूर्ण कृतीतून करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणच्या कुरुंदवाड उपविभागात शिपाईपदी ते कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रिळे हे आहे. ते एक हरहुन्नरी, स्वच्छंदी कलाकार आहेत. त्यांना सुविचार लेखनासोबत सुविचार गोळा करण्याचा, कागद तसेच पुठ्ठ्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचा, फोटोग्राफीचा व चित्रकलेचा छंद आहे. कागदी पुठ्ठ्यापासून घरांच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती त्यांनी बनविल्या आहेत.
गेल्या आठ वर्षांपासून ते दैनंदिन, कार्यालयाच्या प्रवेशद्वाराशेजारी असणाऱ्या वार्ताफलकांवर सुविचार लेखनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या सुविचार संग्रहाला वाचनातून,अनुभवांतून आलेली समृद्धीची झालर आहे. कोल्हापूरी भाषेचा साज असलेला “रांगडेपणा” आहे. मानवी मनाला, बुध्दीला वैचारिक खाद्य पुरविण्याचा त्यांचा नित्य उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा ठरला आहे. त्यांच्या या उपक्रमाची नोंद स्थानिक अधिकारी-कर्मचारी, पंचक्रोशीतील वीज ग्राहक, नागरिक, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांचे वेळोवेळी “विचारधनी राजाराम” या शब्दात कौतुक केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कृतीसाठी त्यांना सलाम आहेच.
त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “कोणतं पण काम करा… इतरांच्या हितासाठी करा… आपल्या नावासाठी करू नका… आधी सिद्ध व्हा… लोक आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करतील. सद्गुण हा सुगंधप्रमाणे असतो, कितीही लपवला तरी लपणार नाही.” अन् “काम करण्यासाठी नावं लागतं असं नाही पण नाव मिळविण्यासाठी काम करावं लागतं.” राजाराम यांच्या कार्याला सलाम !!!