जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक संपन्न
कोल्हापूर (विनायक जितकर) – कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधांपर्यंत जाऊन वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, प्रत्येक गावागावातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून त्यांना आवश्यक शासकीय मदत देणे अभिप्रेत आहे यासाठी येत्या महिनाभरात प्रत्येक तालुक्यात त्या त्या आमदारांना कृषी विभागाकडील सर्व योजनांची व सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती तातडीने देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृह येथे झालेल्या बैठकीला दूरदृश्य प्रणाली द्वारे सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजेंद्र पाटील–यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शासकीय पदावर असताना आपला लोकांसाठी उपयोग व्हावा म्हणून प्रत्येक अधिकाऱ्याने काम केले पाहिजे. येत्या एक महिन्यात सर्व कृषी विभागाचा आढावा घेण्यात येणार असून त्यांनी याबाबत सर्व तयारी करावी. या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये कृषी विभागाने तयार केलेल्या वेगवेगळ्या माहिती पुस्तिकांचे विमोचन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व शेती विषयक माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रणालीचे क्यूआर कोडचे अनावरण ही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात कृषी योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या ड्रोनचे वाटप दोन लाभार्थींना करण्यात आले.
या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीतील उपस्थित केलेल्या मुद्द्यांमधील कार्यवाही बाबत अहवाल सादर केला. तसेच त्यांनी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा नियोजन बैठकीबाबत संगणकीय सादरीकरण केले. कोल्हापूर जिल्ह्यातील खरीप हंगाम सरासरी क्षेत्र ऊस वगळून १.९३ लक्ष हेक्टर आहे. उन्हाळी सरासरी रब्बी क्षेत्र ०.२१ लक्ष हेक्टर आहे. सरासरी ऊस क्षेत्र १.९८ लक्ष हेक्टर आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण सिंचनाखालील क्षेत्र हे २.०८ लक्ष हेक्टर म्हणजेच ४६.६०% आहे. खातेदारांची संख्या जिल्ह्यात एकूण ६ लाख ६० हजार ६७६ इतकी आहे. जिल्ह्यातील सर्वसाधारण एकूण खरीप क्षेत्र ३ लाख ९१ हजार हेक्टर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादकता देश आणि राज्याच्या तुलनेत जास्त असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले. २०२४–२५ या वर्षात अवेळी पाऊस, वादळी वारे व गारपीट, अतिवृष्टी व पूर यामुळे नुकसान झालेल्या ४७ हजार ९८३ हेक्टर क्षेत्रामधील १ लाख ४१ हजार ७०५ शेतकऱ्यांना १०७.३७ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली.
खरीप हंगाम २०२५ मधील उपलब्ध होणारे बियाणे मुबलक असून त्याचा तुटवडा नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच खत पुरवठा बाबतही यावर्षी जिल्ह्यात तुटवडा नाही असे ते म्हणाले. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी शेतकरी संख्या खरीप साठी ८६ हजार ६५४ एवढी आहे तर रब्बी साठी ५ हजार ६१७ इतकी आहे. यातील ७ हजार १२४ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. त्याची रक्कम ६.३७ कोटी इतकी आहे. पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजनेत २०२० पासून एकूण १९ हप्त्यांचे प्रती हप्ता २ हजार प्रमाणे अनुदान वितरित करण्यात आले आहे. वितरित करण्यात आलेली एकूण रक्कम १७८६ कोटी इतकी आहे. तर नमो शेतकरी महा सन्मान योजनेत २०२३ पासून सहा हप्त्यांचे प्रति हप्ता २ हजार प्रमाणे अनुदान वितरित करण्यात आले आहे यातील वितरित रक्कम ५७२ कोटी आहे. मागील वर्षी पी एम किसान योजनेतून २७६ कोटी तर नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ४०२ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत कोल्हापूरचा राज्यात दुसरा क्रमांक आलेला आहे. यामध्ये प्राप्त २५१० प्रस्तावांमधील १ हजार प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ५९३ लाभार्थ्यांना ४१ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. मागील वर्षी ४१५ लक्षांक होता यातील १०४ टक्के काम पूर्ण झाले असून ४३२ साध्य आहे. यासाठी मंजूर रक्कम २६ कोटी ५१ लाख असून एकूण ४३२ प्रस्ताव मंजूर करत राज्यात दुसरे स्थान प्राप्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी कोल्हापूर जिल्ह्याने केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्या त्या तालुक्यातील विविध समस्या मांडल्या. यामध्ये चंदगड आजरा तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याबाबत पंचनामे अद्याप का केले नाहीत याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी पंधरा दिवसात अतिरिक्त मनुष्यबळ लावून याबाबत पंचनामे करणार असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे हत्ती तसेच गव्यांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होते याबाबत वनविभागाबरोबर बैठक लावून त्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील पिक कर्ज लक्षांक व साध्य याबाबत चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी लक्षांक वाढवण्यासाठी सूचना केल्या. राष्ट्रीयकृत बँकांना उद्दिष्ट वाढवा असेही ते यावेळी म्हणाले. नाबार्ड संस्थेने तालुक्यात फिरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले पाहिजेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांना वीज जोडणी बाबत येत असलेल्या समस्या सोडवून वीज जोडणीतील निकषात बदल करण्यासाठी राज्यस्तरावरून प्रयत्न करावेत असेही यावेळी बैठकीत ठरले. सौर कृषी पंप कुसुम ब योजनेतील पैसे भरलेले पात्र ग्राहक व स्थापित सौर पंप यामधील फरक मोठ्या प्रमाणात असून ज्या पद्धतीने शेतकरी पैसे भरतील तशी प्रकरणे पूर्ण करा अशा सूचना पालकमंत्री श्री आबिटकर यांनी दिल्या.
आमदार राजेंद्र पाटील–यड्रावकर यांनी तालुक्यातील क्षारपड जमिनी बाबत जलसंधारण विभागाने अधिक क्षमतेने काम करून शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यावा अशा सूचना केल्या. तसेच यावेळी या बैठकीत सर्व स्थानिक आमदारांबरोबर समन्वय ठेवून विविध कार्यक्रम कार्यशाळा घेऊन कृषी योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या. तसेच लोकप्रतिनिधींनीही कृषी योजनांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील नाचणी आणि घनसाळ या पिकांबाबत प्राधान्याने उपाययोजना हाती घेण्यात याव्यात अशा सूचना कृषी विभागाला केल्या.