चंद्रकांत पाटील
ग्रामपंचायत पदाधिकारी यासह स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज…
गगनबावडा – ग्रामीण भागात सर्वत्र साजरा होणाऱ्या गणेश उत्सवात वातावरण पर्यावरण पूरक होण्यासाठी फक्त सरकारी यंत्रणा राबण्यापेक्षा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सद्या वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व सरकारी यंत्रणेस मातीच्या मूर्तीचा वापर करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्याची गरज आहे. ग्लोबल वातावरणाने सध्याच्या युगात अनेक ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या गणपतीच्या मूर्तीचा सरास ठिकाणी वापर करण्यात येतो. त्याचबरोबर रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर मूर्तीवर करण्यात येतो. त्यामुळे गणपती विसर्जनावेळी त्या मूर्ती ओढयावर अगर नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. त्या पाण्याचा बऱ्याच ठिकाणी पिण्यासाठी वापर करण्यात येतो. तर काही मूर्ती विरघळन्यास विलंब लागतो.
![]() |
![]() |
कोल्हापूर जिल्हा परिषदेने गेल्या पाच वर्षापासून पर्यावरण पूरक गणपती मूर्तीवर विशेष लक्ष दिले आहे.त्यासाठी ग्रामीण भागात नियोजन करण्यासाठी तयारी चालू आहे. परंतु ग्रामीण भागात ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक नेते यांनी पुढाकार घेवून पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. .त्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, सरकारी कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यासह सर्वाना पर्यावरणासाठी योगदानाची गरज व महत्व याचे मार्गदर्शन करून त्यांना गणपती विसर्जन नदीमध्ये न करता संकलन करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
यासाठी सरकारी कर्मचारी – पदाधिकारी, स्थानिक नेते यांनी सर्वप्रथम स्वतःच्या घरातील मूर्ती संकलन केल्यास त्याचा प्रभाव समाजामध्ये पडून मूर्ती विसर्जनाचे प्रमाण कमी होऊन संकलन अधिक होईल. सन २०१५ मध्ये १ लाख ८२ हजर ४४२ गणपती मूर्तींचे संकलन झाले होते. त्याचे प्रमाण सन २०१६ मध्ये वाढून २ लाख ३५ हजार ८८९ इतक्या मूर्ती विसर्जित न होता संकलन झाले होते.२०१७ ते २०२२ मध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सरकारी कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सेवा संस्था, दुध संस्था सचिव यांना पर्यावरण जागृतीसाठी सक्ती करणे गरजेचे आहे. यांनी मूर्ती दान केल्यास समाजही अग्रेसर रित्या पुढाकार येईल. ग्रामीण भागातील स्थानिक नेते, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यासह गावातील तरूण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मूर्ती संकलन करणे गरजेचे आहे. यासाठी फक्त शासकीय यंत्रणेची वाट न पहाता गावातूनच नेत्यांनी त्याची सुरवात होणे गरजेचे आहे. तरच समाजातील तळागाळातील नागरिक त्यांचे अनुकरन करून पर्यावरण संवर्धनास मदत होणार आहे.
- पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज गगनबावडा तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी जलस्रोत वाचवने गरजेचे आहे , हानिकारक रसायनांनी बनवलेल्या मूर्ती पाण्याचे स्रोत प्रदूषित करतात. तर माती आणि इको उत्पादनांनी बनवलेल्या मूर्ती पाणवठ्यांसाठी सुरक्षित असतात. त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. – (माधुरी आर. परीट गटविकास अधिकारी पंचायत समिती गगनबावडा)
- गगनबावडा तालुका हा निसर्ग संपन्न असा तालुका आहे. आम्ही गेल्या४ वर्षा पासून मुर्तीदान करत आहे मुर्ती दान केल्या मुळे प्रदुषण रोखण्यासाठी आमचा कमी प्रमाणात का असेना हातभार लागत असल्याने आम्हाला मोठे समधान मिळत आहे इतरही लोकांनी मुर्ती दान करुन प्रदुषण रोखण्यास सहकार्य करावे. – (राणोजी सुतार, सामाजिक कार्यकर्ते भाजपा ओबीसी अध्यक्ष गगनबावडा तालुका)
