सुसंस्कारित पिढीसाठी मूल्यसंस्कार
महत्त्वाचे- युवासंत नितीनभाऊ मोरे
अंबिकानगरमध्ये केंद्र सक्षमीकरण अभियान उत्साहात
नाशिक (प्रतिनिधी): मूल्यसंस्कार हा श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचा गाभा आहे. मूल्य संस्कारातूनच सुसंस्कारित पिढी घडते. त्यामुळेच सेवामार्गाने या विभागाला झुकते माप दिले आहे असे विचार युवासंत गुरुपुत्र श्री.नितीनभाऊ मोरे यांनी मांडले.
अंबिकानगर मधील नवनागापूर सेवाकेंद्रात केंद्र सक्षमीकरण अभियानांतर्गत गुरुपुत्र श्री. मोरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सेवामार्गातर्फे वर्षातून दोन वेळा मूल्यसंस्कार शिबीर घेण्यात येते. यंदा ८ जून २०२५ रोजी संपूर्ण देशभरात जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरावर शिबीर होत असून शिबिराची रूपरेषा ठरली आहे. त्याप्रमाणेच सर्व केंद्रांनी शिबीर घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.
मूल्य संस्काराचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले की, आज शाळकरी मुलांमध्ये सर्वाधिक व्यसन आणि गुन्हेगारीचे प्रमाण आढळून आले आहे. ही फारच गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. मुलांवर योग्य वयात संस्कार केले तर ती मुले सुसंस्कारित होऊन जीवनात यशस्वी होतात. त्यासाठीच सेवामार्गातर्फे प्रत्येक सेवाकेंद्रात मूल्यसंस्कार वर्ग घेण्यात येतो. त्यामुळे जे पालक आपल्या मुलांना सेवाकेंद्रात पाठवत नसतील त्यांनी अवश्य पाठवावे असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
सेवामार्गात भक्ती- ज्ञान- कर्मयोग
ते पुढे म्हणाले की, गीतेतील भक्ती, ज्ञान आणि कर्मयोगाच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊली नेहमी मार्गदर्शन करतात. आज समाजामध्ये अध्यात्माचा जो बाजार मांडला गेला आहे त्यामुळे किती जणांचे प्रश्न सुटत असतील हा संशोधनाचा विषय आहे. मात्र परमपूज्य गुरुमाऊलींनी सर्वांपर्यंत योग्य अध्यात्म पोहोचविले असून त्यामुळेच आज लाखो लोकांचे दुःख,कष्ट आणि समस्या दूर होऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतोय. असे सांगताना ते म्हणाले की, जो सेवेकरी आईवडिलांची सेवा करतो, रोज वैयक्तिक आध्यात्मिक सेवा करतो आणि सेवाकेंद्रात विविध उपक्रमांमध्ये, अभियानांमध्ये सक्रिय योगदान देतो त्याच्यावर ईश्वरी कृपा लवकर होते असे त्यांनी नमूद केले.
मथुरेत भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह सेवा...
सेवामार्गातर्फे विश्वशांती आणि राष्ट्रहितासाठी २७ जून ते ४ जुलै या काळात श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह होत असून ही सेवा श्रीकृष्णांच्या पुण्यभूमीत आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सान्निध्यात होत असल्यामुळे या सेवेला विशेष महत्त्व आहे याकडे त्यांनी सेवेकऱ्यांचे लक्ष वेधले.