जिजाऊ संस्थेस महाराष्ट्र शासनाचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने गेली १५ वर्षे निस्वार्थपणे केलेल्या कार्याची घेतली दखल…

पालघर – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या सामाजिक संस्थांना दिला जाणारा सर्वोच्च प्रतिष्ठेचा सन २०२२ – २३ यावर्षीचा ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार  जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेला जाहीर झाला. सदर पुरस्कार नुकताच मंगळवार १२ मार्च रोजी मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृह येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात शासनाच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र  शासनाच्या वतीने राज्यात सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून मुख्यमंत्री तथा मंत्री सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीकडून पुरस्कारासाठी संस्थेची निवड केली जाते. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने गेली १५ वर्ष केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार २०२२ – २३ साठी संस्थेची निवड करत हा पुरस्कार आज मुंबई येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि  सुमंत भांगे (भा. प्र. से.) सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही सन २००८ पासून सातत्याने मागील १५ वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण या पंचुसुत्रीवर महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत कार्य करत आहे. ही संस्था कुठल्याही प्रकारचे अनुदान अथवा देणगी न घेता स्वखर्चाने आपले उपक्रम सर्वसामन्यांसाठी मोफत राबवत आहे. संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे आपल्या व्यवसायातल्या एकूण उत्पन्नातून ८० टक्के रक्कम ही समाजसेवेसाठी, समाजाच्या हितासाठी नि:स्वार्थी भावनेने खर्च करत आहेत. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावात भगवान महादेव सांबरे हे १३० बेड्सचे २४ तास सुरु असलेले नि:शुल्क रुग्णालय, रुग्णवाहिका तसेच वर्षभर प्रत्येक दिवशी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे हे उपक्रम देखील राबविले जातात. गोर – गरीब वर्गाला अत्याधुनिक शिक्षणाचा परिस्पर्श दुर्गम भागात संस्थेच्यावतीने अशा ८ सीबीएसई निःशुल्क शाळा चालवण्यात येत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी २५ लाख वह्यांचे मोफत वाटप केले जाते. संस्थेच्या वतीने जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा २०१६ साली सुरु करण्यात आली. १५१ आदिवासी दिव्यांग मुलांचे पालकत्व संस्थेने स्वीकारले आहे. प्रशासकीय स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी घडावेत यासाठी ४५ जिजाऊ MPSC/UPSC अकॅडमी मोफत वाचनालयांची सुरुवात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. ज्यातून अनेक मोठ मोठ्या हुद्यांवारचे अधिकारी घडत आहेत.

ग्रामीण भागातील अंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत या हेतूने जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी सुरु आहे. संस्थेच्या सुसज्ज मैदानात तसेच मॅट सुविधेसह  खेळाडूंना १२ ही महिने प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक महिला ही सक्षम झालीच पाहीजे. यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारप्रवण करणारे अनेक विविध उपक्रम राबवले जातात. दरवर्षी शेतकऱ्यांना ५ लाख मोफत फळरोपांचे वाटप करण्यात येते. कुक्कूटपालन व दुग्धव्यवसायास चालना देऊन सक्षम शेतकरी घडविण्याचा मानस आहे. ठाण्यातील कचरावेचक मुलांसाठी कचऱ्यावरची शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. झोपडपट्टीतील ही मुले साक्षर व्हावीत यासाठी त्यांच्या शालेय स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पूर्ण करत आहे.

या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना संस्थेचे संस्थापक निलेश सांबारे यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येकाला त्याचा हक्क मिळवून देणे, प्रत्येक वंचित व्यक्तीला त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे, शैक्षणिक पायाभूत सुविधा, उत्तम आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार अशा विविध माध्यमांनी वंचित असलेल्यांना सक्षम करणे, हे जिजाऊ संस्थेचं मुळ ध्येय आहे या पुरस्काराने आम्हाला आनंद झाला असून यापुढे अधिक चांगले काम करण्यासाठी आम्हांला महाराष्ट्र शासनाची ही कौतुकाची थाप मोठी उर्जा देईल.”

तर संस्थेच्या अध्यक्षा भावनादेवी सांबरे यांनी सांगितले की, या आधी देखील संस्थेला विविध ठिकाणांहून एकूण २१ प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाचा मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असून याचा आनंद हा फार वेगळा आहे. आमच्या जिजाऊ परिवारातील प्रत्येक सदस्याच्या प्रामाणिक कामाची मिळालेली ही पोचपावती आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने व सर्व सदस्यांनी एकमेकांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. तर समाजातील सर्वच क्षेत्रातून संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.