जागतिक महिला दिनाच्या परिसंवादात काय घडलं! शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलमध्ये जमल्या या मैत्रिणी…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा…यशस्वी महिलांचा शालेय विद्यार्थ्यांना कानमंत्र…

 

_जागतिक महिला दिनानिमित्त शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलमध्ये परिसंवाद संपन्न_

*जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा*
*-विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांनी दिला शालेय विद्यार्थ्यांना कानमंत्र*

कोल्हापूर, दि. 6: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शालेय विद्यार्थी दशेतच मोठं ध्येय बाळगा. ध्येयपूर्तीसाठी अभ्यासात सातत्य ठेवा. अवांतर वाचनाची गोडी निर्माण करा. मोबाईलचे व्यसन टाळा. गुगल, सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी करा, आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून खडतर परिश्रम केल्यास हमखास यश प्राप्ती होत असल्याचा कानमंत्र विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांनी दिला.

जागतिक महिला दिनानिमित्त शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव एम. एस. पाटोळे, मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, राज्य कर विभागाच्या उपायुक्त वैशाली काशीद, माहिती अधिकारी वृषाली पाटील, पुण्याच्या पोलीस उपनिरीक्षक (सीआयडी) दीपाली अतकरे – पाटील, चिपळूणच्या एएचए हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या प्राचार्या तथा आकार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी कार्वेकर – ओतारी, मीरा डे केअरच्या संचालिका चित्रा भोई – सुपेकर, फॅशन डिझायनर विशाखा वसंत चिले
आदी मान्यवर उपस्थित होते.


“शाळेत शिकत असताना पाचवी मध्ये गणितात नापास झाले होते, पण तरीही खचून न जाता मी अभ्यास केला आणि जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झाले. परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता झोकून देऊन अभ्यास करा, असा सल्ला जीएसटी विभागाच्या उपायुक्त वैशाली काशीद यांनी व्यक्त केला.

आईवडीलांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीमुळेच माझ्यासह दोन्ही भाऊ आपापल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असल्याचा अभिमान व्यक्त करुन माहिती अधिकारी वृषाली पाटील म्हणाल्या, जीवनात यशस्वी होण्यासाठी खडतर परिश्रम, अवांतर वाचन करा. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींची माहिती आणि अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी करा. विद्यार्थ्यांनीही आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आपले स्वप्न साकार करण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्यास हमखास यशप्राप्ती होते, असा विश्वास श्रीमती पाटील यांनी व्यक्त केला.

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ‘माई’ -HOME AD

जीवनात आलेल्या अनेक संकटांना सामोरे जात त्यावर मात करुन पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घालणाऱ्या दिपाली अतकरे- पाटील यांनी आपला जीवनपट उलगडून दाखवला. त्या म्हणाल्या, एखादे ध्येय उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली तर विजयश्री खेचून आणता येते. आई -वडील आणि गुरुजनांनी लावलेल्या शिस्तीमुळेच अडचणींतूनही यशस्वीरित्या घडल्याचे त्यांनी सांगितले.

एएचए हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या प्राचार्या रोहिणी कार्वेकर- ओतारी म्हणाल्या, केवळ दहावीच्या गुणांवर करिअर अवलंबून असत नाही. काम करण्याची इच्छा आणि आवड असणाऱ्या क्षेत्रात जिद्द आणि चिकाटीने यश मिळू शकते, हे स्वतः च्या उदाहरणातून स्पष्ट केले. शाळेत असताना दुसऱ्या, तिसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण होणारे कितीतरी विद्यार्थी जीवनात यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. शाळेत जीवनात अभ्यासात हुशार असले तरी वर्गात सर्वांशी खूप कमी बोलत होते. सध्या मात्र प्राचार्य म्हणून उत्कृष्टपणे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे काम करताना अनेक गरीब विद्यार्थिनींना भरारी घेण्याचे धाडस निर्माण केले असून अनेक मुली व स्त्रियांना त्यांच्या आरोग्यासाठी योग प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.

फॅशन डिझायनर विशाखा चिले यांनी आपली आवड व छंद यातूनच करिअर घडते. फॅशन डिझायनिंग सारख्या क्षेत्रातील संधीची माहिती देवून कोणत्याही संधीची वाट न पाहता ती संधी स्वतः निर्माण करा व त्यातून पुढे मार्ग शोधा, असा संदेश दिला.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात पती-पत्नी दोघेही कामानिमित्त बाहेर पडतात. अशावेळी लहान बालकांची जबाबदारी सक्षमपणे पेलणाऱ्या मीरा डे केअरच्या संचालिका चित्रा सुपेकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हायचे असेल तर पालकांनीही त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. कुटुंबात मुले व ज्येष्ठांशी संवाद साधल्यास डे केअर व वृद्धाश्रमांची गरज भासणार नाही. एकत्र कुटुंब पद्धती ही विभक्त होत चालली असून त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे, अशी खंत व्यक्त करुन गरज भासल्यास वृद्धाश्रमही सुरु करण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून परिसंवाद आयोजित करण्यामागील हेतू विशद केला. विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेतून शिकून गेलेल्या आणि सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करत असलेल्या विद्यार्थिनींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, या विचारांनी महिला दिनानिमित्त हा परिसंवाद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सचिव एम. एस. पाटोळे यांनी महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थिनींच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन शितल कपिलेश्वरी आणि सोनाली महाजन यांनी केले. निर्मला शेळके यांनी आभार मानले.कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.