मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
बिद्री (विनायक जितकर) – राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मिळावा यासाठी आज मजरे कासारवाडा येथे आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी प्रख्यात वक्ते आनंदा शिंदे यांनी ग्रामपंचायत विकासाचे महत्व, कर वसुलीतील नागरिकांचा सहभाग, स्वच्छता, डिजिटल ग्रामपंचायत व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली जनजागृती यावर थेट आणि प्रभावी मार्गदर्शन केले.
आपल्या उत्साही भाषणात आनंदा शिंदे म्हणाले, “गावाच्या विकासाची खरी ताकद ग्रामस्थांच्या एकजुटीत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ शासकीय उपक्रम नसून गावचा भविष्यकालीन पाया मजबूत करण्याची संधी आहे. प्रत्येक ग्रामस्थाने आपली जबाबदारी ओळखून सक्रिय भूमिका घेतली पाहिजे.”
व्याख्यानादरम्यान युवक, ग्रामपंचायत सदस्य आणि वरिष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रश्नोत्तरातून आपले विचार मांडले. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसलेला आत्मविश्वास आणि उत्साह पाहून गाव विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत होती. या उपक्रमामुळे मजरे कासारवाडा ग्रामपंचायत कर वसुली, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाच्या वाटचालीत एक आदर्श निर्माण करेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था पदाधिकारी, स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.