महिला मेळाव्यात बचत गटांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध योजनांमधून २४.५ कोटी रुपयांचे कर्ज आणि अनुदान वितरण
तुरंबे (विनायक जितकर) – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध योजनांमधून महिलांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, तसेच सर्व महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी बचत गटांच्या चळवळीला प्रोत्साहन देणे गरजेचे असून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदेच्या वतीने अर्जुनवाडा राधानगरी येथे महिला व आवास योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते बचत गटांना समुदाय गुंतवणूक निधी, अवजार बँक, उत्पादक गट व समाज कल्याण विभागांतर्गत पावर टिलर आणि रोटावेटर, मागासवर्गीय महिला बचत गटांना आधुनिक यंत्रसामग्री पुरवण्यासाठी एकूण २४.५ कोटी रुपयांचे कर्ज व अनुदान वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, ‘उमेद अभियानातून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रभावी कार्य केले आहे. गाव स्तरावरील मायक्रो फायनान्स घटकांद्वारे होणारी महिलांची पिळवणूक थांबवणे गरजेचे आहे. बचत गटांच्या अर्थचक्राची व्याप्ती वाढवून महिलांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. सातत्याने अशा महिला मेळाव्यांचे आयोजन करून महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.’ ते पुढे म्हणाले, भविष्यात चांगले काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार व सन्मान देऊन गौरविण्यात येईल. उमेदच्या विविध योजनांचा उपयोग करून महिलांनी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा. पालकमंत्री यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ५० हजार घरकुलांचे काम येत्या २६ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उद्धिष्टपूर्ती नंतर तपोवन, कोल्हापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरकुलांच्या चाव्या लाभार्थ्यांना वितरित केल्या जातील.
सुरुवातीला महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती क्यूआर कोडद्वारे देणाऱ्या विशेष प्रणालीचे अनावरण करण्यात आले. उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच उपलब्ध करून दिल्याबद्दल बँक ऑफ इंडिया आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, तहसीलदार अनिता देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद भामरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, नाबार्डचे आशुतोष जाधव, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, माजी उपसभापती अरुण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना जाधव, शामराव भावके, अरविंद पाटील, यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, तालुक्यातील महिला सरपंच व बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.
प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी सांगितले की, जिल्ह्यात २५,५९९ स्वयंसहायता समूह गट आहेत. १,२७७ ग्राम संघ, ६७ प्रभाग संघ असून १,४४८ समुदाय संसाधन व्यक्ती आणि २५,४८८ वैयक्तिक व सामूहिक व्यवसाय सक्रिय आहेत. बँक पतपुरवठा गट १,१४३ असून, ४२३ कोटी रुपयांचा बँक पतपुरवठा करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा शिंदे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी मानले.