विनायक जितकर
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) कोल्हापूर विभागाची मागणी…
कोल्हापूर – जिल्ह्यात व तालुक्याचे ठिकाणी कामासाठी येणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना विश्रांतीसाठी शासकीय कार्यालय इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावेत व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन उभारावे अशी मागणी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या सूचनेनुसार मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागातील पत्रकार हे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी येत असतात अनेकवेळा शासकीय कामास वेळ लागतो त्यावेळी बसायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. तसेच महिला पत्रकारांसाठी पत्रकार कक्षात स्वतंत्र आरामकक्ष व स्वच्छतागृह असणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) कोल्हापूर यांच्यावतीने देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिष्टमंडळास सांगितले की जिल्ह्यात पत्रकार भवन व पत्रकार असावे ही मागणी योग्य असून यासाठी शासन दरबारी आवश्यक ते प्रयत्न करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात संस्थापक व राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुभाष सामंत, संस्थापक व पुणे विभागाचे संघटन सचिव शेखर धोंगडे, हातकणंगले तालुकाध्यक्ष राजेंद्र शिंदे, मारुती गायकवाड, विजय बकरे, राजेंद्र पुजारी, कृष्णा हिरवे, विनायक जितकर, प्रतीक निंबाळकर, रणजीत देवणे, सचिन उगळे, नाथाराम डवरी, राजेश वाघमारे, कल्पिता कुंभार, पौर्णिमा पवार इत्यादी ग्रामीण पत्रकार हजर होते.