परदेशात भारतीय संस्कृती बळकट होण्यासाठी विश्वशांती महोत्सव : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
नाशिक (प्रतिनिधी) : परदेशात भारतीय संस्कृती बळकट होण्यासाठी विश्वशांती महोत्सवाचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. यावर्षी सध्या सुरू असलेल्या नोव्हेंबर महिन्यात हा महोत्सव होत आहे अशी माहिती अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी यांनी दिली.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये शनिवारी (१ नोव्हेंबर) गुरुमाऊलींचा साप्ताहिक सत्संग मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना त्यांनी संबोधित केले.यावेळी गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा मोरे व गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.
अमेरिका, कॅनडा,इंग्लंडमध्ये महोत्सव
सेवामार्गातर्फे ७ ते १८ नोव्हेंबर या काळात अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये विश्वशांती महोत्सव व आंतरराष्ट्रीय सत्संग मेळावे होत आहेत. भारतीय संस्कृती जगभर पोहोचविण्यासाठी आणि परदेशातील दुःखी माणसांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत असे गुरुमाऊलींनी नमूद केले.
दामोदर-तुलसी विवाह, नवनाथ पारायण
सेवामार्गातर्फे आगामी उपक्रमांची माहिती देताना गुरुमाऊली म्हणाले की, ३ नोव्हेंबर रोजी नाशिकच्या सिडको भागात संपूर्ण दिवसभर वधु- वर परिचय मेळावा आणि सायंकाळी दामोदर- तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर ५ नोव्हेंबर रोजी ७५० वाती जाळून सेवेकर्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा करावा. रविवार दि.९ नोव्हेंबर रोजी राष्ट्र आणि समाज हितासाठी गुरुपीठात एक दिवसीय नवनाथ पारायण,दि. १२ नोव्हेंबर रोजी गुरुपीठात श्री कालभैरव जयंती निमित्त श्री कालभैरव पूजन आणि चंडीयाग तर शनिवार दि.२२ नोव्हेंबर रोजी गुरुपीठात मासिक सत्संग होईल.
दि.२१ ते २६ नोव्हेंबर या काळात सेवेकर्यांनी खंडोबा षडरात्रोत्सवानिमित्त जास्तीत जास्त मल्हारी सप्तशतीची पारायणे करावीत आणि दि २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात होणाऱ्या श्री दत्त जयंती निमित्त अखंड नामजप सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रींच्या चरणी सेवा समर्पित करावी अशी सूचना त्यांनी केली.
राष्ट्रहितासाठी एक दिवसीय गुरुचरित्र पारायण
गुरुपीठात १ नोव्हेंबर रोजी राष्ट्र आणि समाज हितासाठी घेण्यात आलेल्या एक दिवसीय गुरुचरित्र पारायणात २२५ सेवेकर्यांनी सहभाग घेतला. सायंकाळी गुरुमाऊलींच्या दर्शन आणि आशीर्वाद सोहळ्यानंतर पारायणाची सांगता झाली.
















































