![]() |
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला शुभारंभ कोल्हापूर: राज्यातील महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील निवडक 1 हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचा तसेच विविध उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील 40 महाविद्यालयांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, या संस्थेचे डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक विरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक रजनी मोटे आदी उपस्थित होते.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांमध्ये देण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
कौस्तुभ गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर आभार प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी मानले. |