संभाव्य पूरस्थिती पूर्वतयारी आढावा बैठक : कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा
कोल्हापूर (विनायक जितकर) – जिल्ह्याला पूर्वीच्या पुराचा अनुभव आहे, आता राहिलेल्या उणिवा दूर करून नदी परिसरातील सर्व पाण्याचे स्रोत त्या–त्या वेळी प्रवाहित व्हावेत यासाठी उपाययोजना राबवून सर्व यंत्रणेने सज्ज रहा अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पूर्वतयारीचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला दूरदृश्य प्रणाली द्वारे सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील–यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या सह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीत पूरस्थिती उद्भवू शकणाऱ्या संभाव्य ठिकाणांचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नदीकिनारी व धरण क्षेत्रातील परिस्थिती, पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती व्यवस्थापन, नागरिकांचे स्थलांतर आणि बचावकार्य यावर विशेष भर देण्यात आला. महत्त्वाच्या ठिकाणी मदत केंद्रे उभारणे. आवश्यक साधनसामग्री, औषधे, पाणीपुरवठा आणि अन्नसाठ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे. बचाव पथकांचे सुसज्जीकरण आणि आवश्यक प्रशिक्षण. स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग वाढविणे. नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना पूरस्थितीविषयी सतर्कतेचे संदेश पाठवणे. प्रशासनाकडून वारंवार सूचना जारी करणे. पोलीस, आरोग्य विभाग, महसूल विभाग, तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यातील समन्वय यावर चर्चा करण्यात आली.
पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, ‘नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य आहे. संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी आणि समन्वय महत्त्वाचा आहे.’ बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आणि नागरिकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून ताराराणी सभागृहाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या आपत्ती विषयक विविध साहित्याच्या प्रदर्शनाला उपस्थित मान्यवरांनी भेट दिली. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या आपदा मित्रांच्या सोबतही पूरस्थितीच्या अनुषंगाने तयारीची माहिती जाणून घेतली.
यावेळी दूधगंगा धरणातील गळती बाबत येणाऱ्या वर्षात राहिलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. उपस्थित आमदार महोदयांनी शेतकऱ्यांच्या ग्रीन हाऊस ड्रिप यंत्रणा याबाबतही पुराच्या कालावधीत भरपाई देण्यासाठी समावेश व्हावा अशी मागणी केली. जिल्ह्यातील पूरस्थितीच्या काळात विविध ठिकाणी निवारागृह उभारण्यात येतात त्या ठिकाणी शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी शौचालय किंवा फिरत्या शौचालयांची व्यवस्था व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच पूर भागात वेळेत रेशन पोहोचावे, पिण्याच्या योजना अशा वेळी बंद पडतात त्याबाबत आत्ताच आवश्यक दुरुस्ती तसेच पूर्वतयारी करून त्या अखंडित सुरु राहतील यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी अशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात आल्या. इचलकरंजी तसेच कोवाड परिसरातील नदीपात्रातील आवश्यक गाळ काढून त्या ठिकाणी उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीचे प्रमाण कमी करण्यात येईल. त्यामुळे त्या भागातील गाळ काढण्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजीचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला असून त्याच धर्तीवर कोवाड येथील प्रस्ताव देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील पूरस्थिती बाबत माहिती
जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1772.4 मिलिमीटर आहे. मागील वर्षी 1620 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात बारा तालुके व कोल्हापूर महानगरपालिका यामध्ये एकूण पुराचा पूर्णतः वेढा पडलेली व अंशतः बाधित गावे एकुण 345 असून यातील पूर्णतः बाधित 27 गावे तर अंशतः 318 गावांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2019 मध्ये स्थलांतरित कुटुंबे 1 लाख 2 हजार 557 होती. 2021 च्या पुरावेळी ती संख्या 72 हजार 411 होती तर 2024 या वर्षी 7 हजार 427 स्थलांतरित कुटुंबांची नोंद झाली होती. जिल्ह्यात 129 पुरबाधित संवेदनशील गावे आहेत. मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवलेल्या 2019 मधील संवेदनशील गावांची संख्या 386 होती. तीच संख्या 2021 मध्ये 391 होती. 86 गावांची भूस्खलन गावे म्हणून नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2024 मध्ये वीज पडून एक जण, पुरात वाहून तीन जण व्यक्ती मृत्यू पावले तर सोळा लहान व वीस मोठी जनावरे मृत पावली.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कार्य करणाऱ्या 9 स्वयंसेवी संस्थांकडे 1750 स्वयंसेवक आहेत. जिल्ह्यात उपलब्ध शोध व बचाव साहित्य यामध्ये रबर बोट 70, लाइफ जॅकेट 700, लाइफ रिंग 306, हेवी ड्युटी सर्च लाईट 20, सॉकटर 24, हायड्रोलिक कटर 6, ब्रिथिंग अपॅराटस 6, ब्रिथिंग अपॅराटस अंडरवॉटर 12, इमर्जन्सी लाईट 6 उपलब्ध आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाची निर्मिती केलेली आहे. एक जून 2025 पासून तालुकास्तरीय नियंत्रण कक्षही सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात बारा तालुक्यांमध्ये एकूण 488 निवरा केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तसेच बाधित गावांमध्ये गावनिहाय पूर व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.