विजय बकरे
अवसायनात गेलेल्या पाणीपुरवठा संस्थेची मालमत्ता आणि भांडवल ताब्यात घेऊन संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करा संस्थेच्या सभासदांची निवेदनाद्वारे मागणी…
राधानगरी – राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी इथल्या श्री. दत्त सहकारी उपसा जलसिंचन पाणी पुरवठा संस्था अवसायनात घेऊन नोंदणी रद्द केलीय, संस्थेची मालमत्ता आणि भांडवल ताब्यात घेऊन संस्थेचा निवडणूक कार्यक्रम लाऊन संस्था सभासदांच्या मालकीची करावी या मागणीचे निवेदन राधानगरी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या मुख्य लिपिक आणि अवसायक वर्षा भोई यांना सभासदांनी दिले.
राधानगरी सहायक निबंधक कार्यालयाच्या प्रांगणात खामकरवाडीतील शेतकरी सभासदांनी एकत्रित येत, अवसायक वर्षा भोई यांच्यासमोर तत्कालीन चेअरमन आणि सचिव यांच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचला. अवसायनात जाऊन नोंदणी रद्द झालेली संस्था सध्या एकाव्यक्तीच्या फायद्यासाठी एकाधिकारशाहित सुरू ठेऊन सभासदांना पाणी न देता दुसर्यांना पाणी दिलं जात आहे. त्यामुळे अनावश्यक वीज बिल वाढत आहे. निबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून संस्था सभासदांच्या ताब्यात द्यावी, निवडणूक कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत संस्था सील करावी. अन्यथा अवसायक काळातील संस्थेत होणारा सर्व खर्च अवसायकाना भरावा लागेल. सभासदांच्या न्याय आणि हक्कासाठी निवडणूक लावावी अन्यथा प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सभासदांनी दिला आहे.
यावेळी भीमराव ऱ्हायकर, बळवंत किरुळकर,सरदार ऱ्हायकर, बबन ऱ्हायकर, शिवाजी ऱ्हायकर ,चंद्रकांत किरुळकर आदी उपस्थित होते. याबाबत अवसायक वर्षा भोई यांना विचारलं असता आपल्याकडे सदर संस्थेचा अवसायकाचा चार्ज असून लवकरच कारवाई करणार असल्याचं सांगितलं. अवसायनात संस्था जाऊन नोंदणी रद्द होऊनही पाणी उपसा सुरू ठेऊन विजेचा अपव्यय सुरू असल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याची मागणी महावितरणचे अभियंता आर. जी. कसबे यांनाही निवेदन देण्यात आले आहे.