करवीरसह जिल्ह्यातील ३२४ ठराव दाखल…
कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत तब्बल ३२४ ठराव दाखल करून निवडणुकीपूर्वी दूध उत्पादक संस्थांचा भक्कम पाठिंबा असल्याचे दाखून दिले. करवीर, शिरोळ, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, चंदगड आणि गगनबावडा तालुक्यांतील दूध उत्पादक संस्थांनी मोठ्या संख्येने आपल्या प्रतिनिधीच्या नावाचा ठराव पाटील यांच्याकडे सुपूर्त करत त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला.
विश्वास पाटील हे गेली चार दशके गोकुळच्या सहकार चळवळीत सक्रिय असून प्रत्येक निवडणुकीत त्यांची स्वतंत्र संघटनात्मक यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत राहिली आहे. यंदाही त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ठराव एकत्रित करून आपली संघटनशक्ती अधोरेखित केली. सोमवारी सकाळी कळंबा येथील अमृतसिद्धी कार्यालय येथून ताराबाई पार्क परिसरातील सभागृहात विविध भागांतून आलेल्या दूध उत्पादक संस्था प्रतिनिधी, सभासद आणि कार्यकर्त्यांनी विश्वास पाटील यांची भेट घेऊन आपल्या संस्थांचे ठराव त्यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर धैर्यप्रसाद हॉलकडे निघाले यावेळी समर्थकांनी भव्य रॅली काढत फटाक्यांची आतषबाजी, हलगी आणि विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. काही काळ धैर्यप्रसाद चौक परिसरात काही काळ उत्साही वातारणात निर्माण झाले.
मेळाव्याच्या ठिकाणी “आबाजी हाय तर चिंता नाय…!” या घोषवाक्यासह फलक आणि “आबाजी समर्थक” अशा टोप्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “आबाजी हाय तर चिंता नाय… हा फलक अधिक लक्षवेधी ठरला. गोकुळच्या निवडणुकीसाठी विविध माजी संचालकांनी ठराव दाखल केले असले, तरी एकट्याने ३२४ ठराव दाखल करणारे विश्वास पाटील हे एकमेव संचालक असल्याची चर्चा दुग्ध विकास विभागाच्या कार्यालय परिसरात सुरू होती.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही विश्वास पाटील यांच्याकडे जमा झालेल्या ३२४ ठरावांच्या संख्येची दखल घेत, सामान्य दूध उत्पादकांसाठी केलेल्या कामाची हीच खरी पोहोचपावती असल्याचे सांगितले. तसेच करवीर मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी केलेल्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.
बोलताना विश्वास पाटील म्हणाले, गेली चार दशके गोकुळ हीच माझी कर्मभूमी राहिली आहे. गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर, एस.आर. पाटील, अनेक ज्येष्ठ सहकार नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. नऊ वर्षे चेअरमन म्हणून काम करताना दूध उत्पादकांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. २००४ मध्ये सुरू केलेली वासरू संगोपन योजना आजही यशस्वीपणे सुरू असून तिचा लाभ हजारो दूध उत्पादकांना होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यात दर्जेदार जातिवंत जनावरे तयार होत आहेत, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ते पुढे म्हणाले, गोकुळचे दूध संकलन आगामी काळात २५ लाख लिटरपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दूध उत्पादकांच्या हिताच्या अधिकाधिक योजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरी-केंद्रित निर्णय राबविण्यावर भर राहील. आज दाखल झालेले ३२४ ठराव हे माझ्या वैयक्तिक नेतृत्वाचा गौरव नसून गोकुळच्या विकासावर, सहकाराच्या विचारावर आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी केलेल्या कामावर व्यक्त झालेला विश्वास आहे. हा विश्वास आम्ही अधिक जबाबदारीने जपत गोकुळला देशातील अग्रगण्य दूध संघ म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
शिरोळ तालुक्याचा आबाजींना भक्कम पाठिंबा
करवीर तालुक्यानंतर शिरोळ तालुक्यातून सर्वाधिक ४५ ठराव दाखल झाले. शिरोळ तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी स्वतः उपस्थित राहून आपल्या संस्थांचे ठराव विश्वास पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. शिरोळमधील दूध उत्पादकांनी व्यक्त केलेला हा उत्स्फूर्त पाठिंबा आबाजींच्या चार दशकांच्या कार्याचा, दूध उत्पादकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्यांच्या नेतृत्वावरील दृढ विश्वासाचा प्रत्यय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तालुकानिहाय ठराव : करवीर – २५७, शिरोळ – ४५, राधानगरी – ७, पन्हाळा – ६, हातकणंगले – ६, चंदगड – २, गगनबावडा – १. एकूण ठराव : ३२४.
यावेळी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, विविध तालुक्यांतील दूध उत्पादक संस्था प्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३२४ ठराव दाखल झाल्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाला जिल्हाभरातून दूध संस्थेच्या मिळत असलेल्या व्यापक पाठिंब्याची जोरदार चर्चा सुरू आहे.








































































