भिलार गणात कमळ फुलवण्यासाठी सुप्रिया अनिल भिलारे यांचा झंझावाती प्रचार
पाचगणी प्रतिनिधी – भिलार गणामध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून सुप्रिया भिलारे यांच्या झंझावाती प्रचारामुळे संपूर्ण गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. घराघरात पोहोचून थेट मतदारांशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत मतदारांना भावत असून निवडणूक अटीतटीची होत चालल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. सुप्रिया भिलारे यांनी प्रचारादरम्यान विकास, पारदर्शक कारभार, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांवर भर दिला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे मुद्दे त्यांनी प्रभावीपणे मांडले आहेत.
त्यांच्या भेटीगाठीना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून महिलावर्ग आणि तरुण मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष उत्साह दिसून येत आहे. प्रचार फेरीदरम्यान सुप्रिया भिलारे यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच शेतकरी वर्गाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. “भिलार गणाचा सर्वांगीण विकास हाच माझा संकल्प आहे. जनतेच्या विश्वासावर उतरून काम करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्या प्रत्येक भेटीत ठामपणे सांगताना दिसतात. दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवारांनीही प्रचारात जोर लावला असून भिलार गणात खरी अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
भोसे गावात सुप्रिया भिलारे यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रत्येक कुटुंबाच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न समजून घेत त्यांनी विकासाचा विश्वास दिला. या प्रचाराला पती व भाजप तालुका अध्यक्ष अनिल भिलारे यांचा भक्कम पाठिंबा मिळत असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि नियोजनबद्ध प्रचार मोहिमेमुळे प्रचाराला अधिक धार आली आहे. अनिल भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांचे संघटन आणि मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रचार केवळ घोषणांपुरता न राहता प्रभावी आणि परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. भिलार गण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी यावेळी भाजपने हा गण जिंकण्याची ठोस तयारी केली असून सुप्रिया भिलारे यांच्या रूपाने राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.
मात्र सुप्रिया भिलारे यांचा सातत्यपूर्ण संपर्क, सकारात्मक प्रचार आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे त्यांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे.गणातील विविध भागांत झालेल्या प्रचार रॅली, पदयात्रा आणि बैठकींमुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. येणाऱ्या दिवसांत प्रचार आणखी तीव्र होणार असून भिलार गणाचा निकाल कोणाच्या पारड्यात पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















































