कोल्हापूर : 8 ऑगस्ट पर्यंत या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने नागरिकांचे समस्या समाधान अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनापर्यंत समस्या पोहोचवण्यासाठी स्वतःहून पुढे येऊन आपल्या अडचणी, तक्रारी संबंधित कार्यालयात सादर कराव्यात अशी माहिती कागल तहसिलदार अमरदिप वाकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
कागल तालुक्यात तहसिलदार कागल यांचे अध्यक्षतेखाली समीती गठीत करण्यात आली असून या समीतीमध्ये सर्व विभागातील कार्यालय प्रमुख हे सदस्य आहेत. या अभियानामध्ये नागरिकांचे अर्ज प्रत्येक कार्यालयात स्विकारले जातील. नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारी, अडचणी व मागण्यांचे वेळेत आणि प्रभावीपणे निराकरण करणे हा आहे. मुख्यमंत्री यांचे संकल्पनेंतर्गत प्रशासनाच्या गतिमानतेसाठी हे विशेष अभियान आखण्यात आले असून, जनतेला शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, हाच मुख्य हेतू आहे.
या अभियानात नागरिकांनी त्यांना भेडसावत असलेल्या समस्या, तक्रारी किंवा मागण्या संबंधित शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन लेखी स्वरूपात सादर कराव्यात. अर्ज सादर करताना प्रत्येक अर्जास स्वतंत्र टोकन क्रमांक देण्यात येईल, ज्याच्या आधारे त्या अर्जाची नोंद व पुढील प्रक्रिया केली जाईल. अर्जाची प्राप्ती झाल्यानंतर संबधित अधिकारी त्यावर कार्यवाही करून निश्चित कालावधीत त्याचे निराकरण करतील. टोकन क्रमांकामुळे व त्यावरती असलेल्या बारकोड मुळे नागरिकांना त्यांचा अर्ज कुठल्या स्थितीत आहे याची माहिती घेणे सुलभ होईल.
ही प्रक्रिया पारदर्शक, उत्तरदायी आणि गतिमान प्रशासनाची दिशा दर्शवणारी ठरेल. यामध्ये विविध विभागांचे समन्वयाने काम होईल, जसे की महसूल, ग्रामविकास, नगरविकास, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व इतर विभाग. त्यामुळे विविध क्षेत्रातील समस्या एका व्यासपीठावर सादर करून त्या निकाली लावणे शक्य होईल.
अभियानामध्ये समाविष्ट होणाऱ्या समस्याः शासकीय योजनांअंतर्गत प्रलंबित लाभ, मंजुरी, स्थानिक पातळीवरील नागरी सुविधा समस्या पाणी, रस्ते, वीज, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांशी संबंधित अडचणी, सार्वजनिक हिताच्या सेवा-सुविधांबाबत सुचना व मागण्या, नागरिकांना सर्व शासकीय कार्यालयात विशेष काउंटर उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक अर्जावर योग्य त्या अधिकाऱ्याकडून नोंद घेऊन कार्यवाही केली जाईल. टोकन क्रमांकाच्या आधारे नागरिक ऑनलाइन कार्यालयात माहिती घेऊ शकतील. अर्ज दिल्यानंतर 15 दिवसांत कार्यवाहीचा आढावा घेण्यात येईल. सदर अभियाना मध्ये प्राप्त झालेल्या अर्जावर दिनांक 30 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्णपणे कार्यवाही करणेत येईल.
|