गारगोटी – कोल्हापूर राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प…
राधानगरी (विजय बकरे) – मराठा आरक्षणप्रश्नी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना ताकद देण्यासाठी मराठा समाजबांधवाच्या वतीने मुदाळतिट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सुमारे एक तास गारगोटी-कोल्हापूर राज्य मार्ग रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.
यावेळी आंदोलकांनी आपली भूमिका मांडली. आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. मात्र काही ठराविक नेतेमंडळी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न मराठा समाज कदापी यशस्वी होऊ देणार नाही. मंत्री छगन भुजबळ, आ. गोपीचंद पडळकर, निलेश राणे, गुणरत्न सदावर्ते ही मंडळी आपली किंमत वाढवण्याच्या हेतूने मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत असून अशा नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही आंदोलकांनी केली. या रास्ता रोको राधानगरी भूदरगड कागल तालूक्यातील अनेक मराठा बांधव उपस्थीत होते.
रास्तारोको झाल्यानंतर मागणीचे निवेदन मुरगुडचे सपोनि शिवाजी करे, गारगोटीचे स.पो.नि. सचिन पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे अशोक पाटील, कॉम्रेड सम्राट मोरे, युवराज येडूरे, आनंदा पाटील, ओंकार चव्हाण आदिंची भाषणे झाली. यावेळी सागर पाटील, निवास पाटील, रणजित पाटील, बबन पाटील, चंद्रकांत पाटील, हेमंत पाटील, सचिन भांदीगरे, मच्छिंद्र मुगडे, तानाजी पाटील, रामचंद्र पाटील, अजित पाटील, एकनाथ पाटील यांच्यासह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.